Wednesday, 19 November 2014

प्रेमाचं नातं

पहिल्यांदाच एवढी मोठी कथा लिहिली आहे . काही चूकभूल असल्यास माफ करणे .



"मीरा " एक स्वतःमध्ये रमलेलं व्यक्तिमत्व . पण खरंच इतकं प्रेम करता येत कुणावर ? नाही , माणसांवर तर नक्कीच नाही . कारण जिवंत माणसावर खूप प्रेम  करणं खूप कठीण असतं . कारण प्रेमाबरोबर अपेक्षा आणि मालकी हक्क पण येतो . खरंच जर कृष्ण जिवंत असता तर मीरा अशी वेडी झाली असती का ? आणि झाली असती तर कृष्णाने  तिला आपलं मानलं असतं का ?
तिला स्वतः लाच जाणवलं कि आपले विचार भरकटत चालले आहेत . का विचार करतोय आपण इतका ? आपलं कॉलेज संपून बरीच वर्ष झाली आहेत. बरीच वर्ष झालीत आपलं ते नातं संपुन. मग ऐकल्या जाणार्या प्रत्येक विरहाणित आपण आपल्यालाच का बघतो ? त्याला कदाचित आपण आठवत पण नसू. तो सुखी असेल त्याच्या संसारात, मस्त जगत असेल . तो तसाच होता मस्त जगणारा . जगण्यावर प्रेम करणारा . आणि फक्त जगण्यावरच प्रेम करणारा . आपण मात्र त्याला आपलं जग मानलं , पण तो ?? परत तसेच विचार सुरु झाल्यावर तिने उठून टीव्ही सुरु केला .  ती चॅनेल बदलत राहिली, मग बघण्यासारख काहीच नाही म्हटल्यावर तिनं कॉम्पुटर सुरु केला.

               'ती' तुमच्या आमच्यातली एक . एका मध्यमवर्गीय पापभिरू घरातली संस्कारक्षम मुलगी. स्वतःच्या आनंदापेक्षा समाजच भय बाळगणारी. आईने एखादी गोष्ट सांगितली तर तसेच करणारी. ठराविक मैत्रिणी असणारी , मुलांपासून चार हात लांब राहणारी . कधीतरी मैत्रिणींबरोबर सिनेमाला जाणारी ,  ते पण साधे सरळ  असेच बघणारी .

               ती खरच अशी होती का? परत एकदा विचार मालिका सुरु झाली तिची. खरच कशी होती ती ?
तिला स्वतःला नाटकांची खूप आवड , नुसतं बघायला नाही तर काम करायला मिळावं अशी इच्छा. तशी ती शाळेत असताना बाईंच्या आग्रहावरून काम करायची. पण जशी ती मोठी झाली तसं आईने तिला हे सगळ बंद करायची ताकीद दिली. नाटकं बंद , खेळणं बंद, बाहेर फिरणं बंद , काम असेल तर आईबरोबर जायचं , संध्याकाळी ७ च्या आत घरात आलंच पाहिजे . ती प्रयत्न करत राहिली हे सगळ सांभाळण्याचा आणि आतल्याआत कोमेजत राहिली. कधी कधी तीच मन बंद करून उठायचं , पण आईपुढे कधीच बोलू शकली नाही ती . मग थोडी घुमीच झाली .

              असंच मोठ्या मिनतवारीने मिळालेल्या परवानगीमुळे ती नाटक बघायला आली होती. आणि बघता बघता नाटकाने कब्जा घेतला तिचा. त्या नाटकातला हिरो तिच्या कॉलेज मधलाच होता. तिला तीचं भान राहील नाही, हरवून गेली ती .

               दुसर्या दिवशी पासून तिचे डोळे त्याचा वेध घेत कॉलेज मध्ये भिरभिरत राहिले. तो दिसला कि तिचा दिवस खूप छान जायला लागला आणि दिसला नाही कि आपलं नशीब खोटं म्हणून ती हिरमुसली व्हायला लागली. त्याचा एखादा तरी कटाक्ष आपल्यावर पडावा म्हणून धडपड करायला लागली. 'वेडी' खरच वेडी झाली होती ती त्याच्यासाठी. मग हळू हळू एक एक गोष्ट कळायला लागली तिला. तो कविता खूप छान वाचतो, एवढा छान कि ऐकताना भान हरपायला होतं. तिला कळंत होतं कि ती त्याच्या प्रेमात गुरफटत  चालली आहे. स्वतःला कसा थांबवावं हे काही कळंत नव्हत तिला , न त्याला हे कस सांगाव हे पण . दोघांमध्ये समान मित्र-मैत्रिणी नव्हते त्यामुळे त्याला यातलं काहीही कळण्याची शक्यताच नव्हती. मग काय करावं म्हणजे त्याला हे समजेल? दिवसेंदिवस ती अस्वस्थ होत चालली होती.

              आणि नशिबान तीच दार ठोठावलं. शेवटच्या वर्षाला असताना तीन खूप हिमंत करून नाटकात काम करायचं ठरवलं. आपण खूप मोठी चूक करतोय असा  यायला लागलं. तरीपण धाडस करून ती सरांना भेटली आणि त्यांनी तिची निवड केली . तो पण होता त्या नाटकात , नेहमीप्रमाणे. तालमी संध्याकाळी करायच्या ठरल्या आणि घरी कसा सांगायचं हा प्रश्न पडला तिला. आता मात्र इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली . त्याच्या सोबत वेळ मिळेल म्हणून नाटक महत्वाच होत आणि तसंपण शेवटची संधी होती तिला . पुढच्या वर्षी दोघांची पण वाट वेगळी व्हायची शक्यताच जास्त होती. पण घरी काय सांगायचं यानं ती अस्वस्थ झाली. शेवटी , शेवटच वर्ष असल्यामुळे रोज संध्याकाळी जास्तीचे वर्ग आहेत आणि नंतर आम्ही मैत्रिणी मिळून अभ्यास करणार आहोत असा सांगायचं ठरवलं तिने. हो ना करता शेवटी आई मैत्रिणी कडे अभ्यासाला परवानगी द्यायला तयार झाली . मग तिने एका मैत्रिणीला गळ घातली , पण त्या मैत्रिणीने सांगितलं तू माझ नाव सांग पण कुणी जर विचारलं तर मात्र मी खरं खरं सांगून टाकणार.

          आता मात्र नाटकाच्या तालमी जोरात सुरु झाल्या आणि त्याचा सहवास सुद्धा. तो तिला ओळखत नसल्यामुळे तिच्याशी फारसा बोलायचा नाही. पण हळू हळू तिच्या कामामुळे त्याच लक्ष तिच्याकडे जायला लागलं आणि तिचे टपोरे डोळे त्याला चक्क आवडायला लागले. मग मात्र त्याच्या लक्षात यायला लागलं की, ते डोळे त्याच्याकडेच बघत असतात आणि त्याने बघितलं कि हसतात. त्याला गंमत वाटत होती , पण एका क्षणी जाणवलं कि ते डोळे गुंतत चालले आहेत . मग मात्र अस्वस्थ झाला तो. एका मर्यादेपर्यंतच गोष्टी आवडायच्या त्याला, त्या पुढे नाही. त्याला त्याच एकटं असं प्रिय होतं. त्याच ध्येय वेगळ होत. त्यामध्ये हे असं कुणामध्ये गुंतणं मान्य नव्हत त्याला. त्याला ती चांगली वाटत होती, बोलायला , गप्पा मारायला. दोघांना पण वाचनाची आवड होती,  त्यामुळे गप्पा मारायला मजा यायची. पण आता मात्र तो हळू हळू तिच्यापासून लांब व्हायला लागला , तिला टाळू लागला. ती अस्वस्थ व्हायला लागली. तिला कळेना , अचानक त्याला काय झालं ते ? असा का घडतंय ते ? ती आपलं प्रत्येक  वागणं तपासून बघायला लागली. पण तिला कारण कळेनास झालं. आता मात्र तिला त्रास व्हायला लागला, तिला भरून टाकणारा तो , तीच मन व्यापणारा तो असा लांब लांब जाताना पाहून ती अस्वस्थ झाली. रात्र -रात्र विचार करायला लागली . आणि अशाच एका क्षणी घरी नाटकाविषयी कळलं . घरात वादळ उठलं. शिक्षण बंद करण्यापर्यंत बोलणी झाली. तिने गप्प राहणं पसंद केलं. आणि ती नाटकातून बाहेर पडली . सरांनी खूप प्रयत्न  केले , पण उपयोग झाला नाही. त्याला कळलं , पण त्याने थांबवलं नाही.

शिक्षण पूर्ण झालं , आता पुढे काय? तो कुठे आहे ? काय करतो आहे ? याची तिला माहिती असायचं काही कारणच नव्हत . ते दोघे तेवढे जवळचे मित्र नव्हते . शेवटी , तिच्या काकांच्या ओळखीने एका ठिकाणी तिला नोकरी मिळाली . ओळखीने नोकरी मिळण्याचे जसे फायदे असतात तसेच तोटे पण असतात. ऑफिस मध्ये तिला कुणी जवळ करत नव्हत, न ती आपणहून कुणाशी बोलायला जात होती. ती अजूनच अबोल झाली.

                          अशीच ३-४ वर्षे निघून गेली. आणि अचानक तो दिसला तिला . एवढ्या वर्षात तो कुठे होता काय करत होता काहीच कळलं नव्हत तिला. पण ती मात्र त्याला विसरू शकली नव्हती. तिला अस्तित्व तरी कुठे उरल होतं ? ती ती राहिलीच कुठे होती ? तिच्या डोक्यात फक्त तो आणि तोच होता. आणि असा अचानक तो आल्यावर ती गोंधळून गेली . तिला काही सुचेनासं झालं. त्यान तिला ओळखल पण नाही. तो तसाच तिच्या समोरून निघून गेला. आयुष्यात पहिल्यांदाच ती हादरली . ज्याच्याशिवाय आपल्याला अस्तित्व नाही असा आपण मानतो, त्यानं ओळखलं पण नाही आपल्याला. ती सुन्नपणे बसून राहिली. डोक्यातले विचार काढायचा प्रयत्न केला तिने पण ते विचार काही पाठ सोडायला तयार नव्हते. त्याने साधं ओळखू पण नये आपल्याला ? या विचारांनी अस्वस्थता वाढायला लागली तिची. कामात चुका झाल्या . आणि तिच्या सरांची बोलणी खाल्ली तिने . एवढ्या वर्षात पहिल्यांदाच असं झालं . आणि दुसर्या दिवशी मात्र तो तिला  ऑफिस मध्ये दिसला, काहीतरी कामासाठी आलेला. तिच्या सरांनी तिला बोलावलं आणि ओळख करून दिली . मग मात्र मिश्कीलपणे तो म्हणाला , "आम्ही ओळखतो एकमेकांना , आम्ही एकाच कॉलेज आणि बॉचचे आहोत." ती स्तब्ध झाली. तीच जन त्या एका क्षणामध्ये थांबल. तिला तिथल्यातिथे एक आरोळी ठोकाविशी वाटली. ओळखलं याने मला. तो आणि सर पुढे काय बोलत होते ते ऐकु येत नव्हत तिला. आणि अचानक जाणवलं कि सर काहीतरी विचारात आहेत तिला, ती 'हो हो ' म्हणाली आणि बाहेर पडली. आपल्या जागेवर डोक धरून बसून राहिली. तो समोर येवून बसलेला पण कळलं नाही तिला. मग अचानक  टक  लावून पहातंय असा वाटलं तिला. म्हणून तिने मान वर करून पाहिलं तर तिच्या काळजाचा ठोकाच चुकला . तिच्या समोर बसून तिच्याकडेच पाहत होता तो .तिने मान वर करताच तो म्हणाला, " बंर नाही का वाटंत ?" भर उन्हाळ्यात , दुपारी प्राजक्तचा सडा पडल्यासारखा वाटला तिला. कालपासून सुरु असलेली मनाची तगमग थांबली आणि मन फुलून आलं. "नाही नाही ठीक आहे ", असा काहीतरी पुटपुटली. तिच्याकडे पहात मंदस्मित करत तो म्हणाला, मी इथे जवळच राहतो , नुकताच राहायला आलो आहे. तुझे सर म्हणजे माझे सख्खे काका . लहानपणपासून त्यांनीच सांभाळलं आहे मला. आता १ महिनाच झाला इथे राहायला आलो आहे. काही काम होत म्हणून आलो होतो इकडे, म्हटलं जाता जाता काकांना भेटून जाव . आज बाकी काही काम नाही ,  असेल तर संध्याकाळी भेटू . भरपूर गप्पा मारायच्या आहेत ". तिची फक्त मान हलली . " ठरलं तर मग वरळी सी फेस वर , संध्याकाळी ७ वाजता ". एवढ बोलून तो निघून गेला. ती मटकन खुर्चीवर बसली. मन अजूनही तळ्यावर आलं नव्हत. आत्ताशी कुठ १ वाजत आला होता, ७ पर्यंत थांबायचं होत तिला. खूप अस्वस्थ मनानं काम करत राहिली ती . काय बोलायचं असेल ? कुठे होता इतकी वर्ष तो ?, लग्न केलं असेल का त्याने ? आपली आठवण झाली असेल का कधी त्याला ? का लग्नाच्या मागणीसाठीच भेटणार असेल ? एक ना असंख्य प्रश्न. वेळ जाता जात नव्हता. तो भेटणार म्हणून मन एकीकडे शांत पण होत आणि अस्वस्थ पण. ५ वाजले तशी सरांना सांगून बाहेर पडली ती . आणि सरळ टॅक्सी केली तिने . आज तिला लोकल मधली गर्दी अज्जिबात नको होती. साधारण ६.३० वाजता ती वरळी सी फेस ला पोहोचली . तिथल्या समुद्राच्या दर्शनाने तिला बरं वाटलं. आता फक्त त्याची वाट पहायची. घरी आई वाट पाहत रहायची तिची, ७ वाजले , ती काळजी करत असेल असा वाटलं तिला . रोज ६.३० पर्यंत घरी पोहोचायची ती . मग भावाच्या संसारात संध्याकाळचा स्वयंपाक आणि अवरा अवर करून अंथरुणाला पाठ टेकेपर्यंत उसंत मिळायची नाही तिला. आता मात्र ७. ३० झाले तरी पत्ता नव्हता त्याचा. अजून किती वेळ वाट पहायची ते कळत नव्हत तिला . शेवटी ७.४५ वाजता ती जायला निघाली . तिला आतून भरून येत होतं . स्वतः चा अपमान झाल्यासारखं वाटत होतं , स्वतःच्या भावनांचा अपमान झाल्यासारखं वाटत होतं . तिचे डोळे भरून यायला लागले होते . एकदम समोर एक टॅक्सी येवून उभी राहिली आणि तो उतरला. तिला १-२ क्षण लागले स्वतः ला सांभाळायला. तिलाच कळत नव्हत काय होतंय ते.

तो उतरला आणि हसला तिच्याकडे बघून, "साॅरी गं, काम संपवताना थोडा उशीर झाला. तुला कळवायला पण काही मार्ग नव्हता. तुला उशीर नाही झाला आहे न ?" ती त्याच्याकडे भरल्यासारखी बघतच राहिली आणि अभावितपणे बोलून गेली ," नाही नाही , मी पण आत्ताच आले आहे . मलाच वाटल तू निघून गेलास कि काय ?" "ठीक आहे , चाल बसू मग थोडावेळ", असा म्हणून त्याने तिचा हात धरला आणि दोघेपण समुद्राकडे चालायला लागले . सगळ्या जगाकडे दुर्लक्ष करून आपण त्याच्याबरोबर असल्याची भावना तिला भरून टाकत होती. त्यानेच सुरवात केली बोलायला. 'कॉलेज संपल्यावर , काकांच्या ओळखीने एका चांगल्या कंपनी मध्ये त्यने अगदी खालच्या लेवल वर काम करायला सुरवात केली होती. त्याचबरोबर तो नाटकात पण काम करत होता. व्यावसायिक नाटकात काम करायला अजून  सुरु केली नव्हती त्याने . तो जितका झोकून देवून नाटकात काम करायचा तेवढच त्याला पैसे कमवायला नोकरीची गरज आहे हे कळत होतं. स्वतः च काम  याची सांगड घातली होती त्याने. त्याला मानणार वर्तुळ होत एक, तिथे तो खूप लोकप्रिय होता. पण काहीतरी कमी वाटत होती त्याला. त्याच्या ऑफिस मधल्याच एका मुलीशी लग्न केल होतं त्याने, पूर्ण विचार करून. खूप आवडली होती ती त्याला. आणि आता साधारण काहीतरी खटकत होत. कुणाशी तरी हे सगळं बोलावसं वाटत होतं. घेतलेला निर्णय चुकला असा वाटत होतं आता. आणि अचानक मागच्या आठवड्यात ती दिसली. अचानक, त्याला  पटकन ओळखताच आलं नाही तिला. खूपच बदलली होती ती. तरीपण आपण हिच्यापाशी बोलू शकतो असा वाटत होत त्याला. "बायको छानच आहे माझी. पण , आजकाल काहीतरी बिनसलं आहे तीचं . घरीच असते , नोकरी वगैरे काही करत नाही . रोज काहीतरी कारण काढते  आणि चिडचिड करते . माझ्या नाटकात काम करण्याला पण विरोध आहे आता तिचा . आम्ही सगळे माझ्या घरी एकत्र जमलो तरी विचित्र बोलते. खूप हट्टी होत चालली आहे. लग्नाला ३वर्ष होतील आता . आधी कधीच अशी नव्हती ती . खूप सुखाचा संसार चालला होता आमचा. कसं बोलाव कसं वागावं काही कळेनासं झालं आहे गं ". बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला होता . थोडा थोडा थांबत तो सगळ तिला सांगत राहीला. आणि डोळ्यातून पडणाऱ्या पाण्याला परतवत , दुखर्या गळ्याने ती ते ऐकत राहिली. यानं लग्न केलं पण ? आणि आपण अजूनही वाट बघतोय याची ?

त्याच्या प्रश्नांनी ती भानावर आली , तो विचारतं होता , "तुला उशीर होत नसेल तर आपण बाहेरच जेवायचं का ? मला अजूनही खूप बोलायचं आहे . आणि मी तुला काहीच विचरला नाही . तू गप्पच आहेस . तुझ्याबद्दल पण ऐकायाच आहे". तिने घडल्याकडे पाहिलं , ९.३० वाजले होते ," अरे बापरे , बराच उशीर झालाय . मला घरी जायला हवं, आई वाट बघत असेल  ". "ठीक ठीक , मी सोडतो तुला . मला खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलल्यावर". त्याला थांबवत ती निघाली तिथून.

घरी आली , आईच्या प्रश्नाचा भडीमार कसाबसा टाळून , दुखर्या मनानं आणि उपाशी पोटानं अंथरुणावर पडली . इतका वेळ आवरून धरलेलं रडू आईच्या लक्षात घेवू नये म्हणून तोंडांत पांघरुणाचा गोळा कोंबून रडायला लागली. कधीतरी त्याच ग्लानीत झोप लागली तिला. सकाळी उठायला उशीरच झाला. आणि लक्षात आलं आज कुणीच कामावर गेला नहिये ना भाऊ, ना वहिनी. सगळे थोड्या विचित्र नजरेने बघत होते. सगळीकडे एक तणाव जाणवत होता. तिला कळत नव्हतं काय झालयं ते?... शेवटी तिच्या वहिनीने विचारलं तीला ’काल इतका उशीर का झाला? ती नजर चुकवत म्हणाली, "अगं ऑफीस मध्ये काम होतं". तीला काही कळायच्या आत तीच्य भावाने खाडकन् मुस्काटात मारली. तिच्या डोळ्यापुढे काजवेच चमकले. "खोटारडी साली रात्री कुणाच्या गळ्यात गळा घालुन वरळीला बसली होतीस?". तिला झटकन् जाणिव झाली. आणि डोळ्यांमधुन पाणी झिरपायला सुरुवात झाली. ती गप्प झाली. काय सांगणार यांना? कोण होता तो ते? म्हटलं तर सर्वस्व नाहीतर कुणीच नाही. तीच्या आईने आतुन तीची बॅग भरून आणली आणि भावानं सांगीतल आपण आता गावाकडे जातोय? ती चाचरत बोलली. "अरे पण माझे नोकरी?" "या नोकरी मुळेच नकोनको त्या गोष्टी करतेस.आजच फोन करुन सांगितलय की तु नोकरी सोडलीस. उद्या गावतल्या देवळात लग्न आहे तुझं माझ्या बॉस बरोबर." तिला धक्काच बसला, इतकी टोकाची भुमिका? तिला मान्य होत की, भावाचा बॉस चांगला आहे आणि त्याला ती आवडते. फक्त त्याचं लग्न झालं होतं आणि वर्षभरातचं डायवोर्स झाला होता. तिला कळतच नव्हतं काय विचार करावा यावर म्हणून.?

आणि लग्न झालं तीच. सगळेजण परत आले. तिचे डोळे एकदम कोरडे झाले होते. जे घडतय त्याच्याशी संबंध नसल्यासारखे घरी परत आल्यावर तीच्या लक्षात आले आता पुढच्या गोष्टी सरळ आहेत. पण तीच्या नवर्याने तीला सांगीतलं, "मी कसलीही जबरदस्ती नाही करणार तुझ्यावर, माझी आई तर अश्या अवस्थेत नस्ती तर मी कधीच इतक्या गडबडीने, असे लग्न केलं नसतं." "अशी अवस्था म्हणजे काय झालयं?" ती कशीबशी म्हणाली." " तिचा ऍक्सीडन्ट झालाय पंधरा दिवसापुर्वी आणि आता ती शुद्धीवर आली आहे, पण डॉकटर म्हणतात तीच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आहे. आणि आता फार दिवस ती राहणार नाही , जर जगलीच तर कोमात जाईल. म्हणूनच इतक्या घाईने लग्न केलं. नाहीतर तुझ्या इच्छेप्रमाणे मस्तपैकी सगळं ठरवून लग्न केलं असतं मी. पण, मी तुझा अनंत आभारी आहे. तु माझ्यावर विश्वास दाखवुन माझ्याशी लग्न केलसं." इतकं म्हणून तो बाहेर निघून गेला. ती तशीच बेडवर बसून राहीली. विचार करत.

सकाळी उठली  तेव्हा बराच उशीर झाला होता. शेजारीच एक चिठ्ठी मिळाली. "मला उशीर होतो आहे मी तुला दुपारी जेवायच्या वेळी भेटेन." स्वयंपाकाला बाई आहेत. आम्ही त्यांना ’काकु’ म्हणतो. त्यांना सांग तुला जे हवं असेल ते. माझ्या कपड्यांच्या कपाटात शेजारचा कप्पा तुझ्यासाठी रिकामा केला आहे. घरातल्या वरच्या कामासाठी ठेवलेल्या बाई १०.३० पर्यंत येतील. जेवणाच्या वेळी भेटूच आणि मग मिळून आईला भेटायला जाऊ."

चिठ्ठी वाचुन तिला कौतुकच वाटलं. किती व्यवस्थित आहेत हे. ती उठून बाहेर आली. तर घर एकदम व्यव्स्थीत असल्याची जाणीव झाली. प्रत्येक गोष्ट एकदम जाणीवपुर्णक निवडल्याची खुण जागोजागी दिसत होत्या. तीला बरं वाटायला  लागलं. तीन स्वत:साठी चहा बनवुन घेतलात तोपर्यंत स्वंयपाकाच्या काकू आणि वरकामाच्या बाईपण आल्या. तीला बघताच दोघींच्या डोळ्यात कौतुक दिसलं.

स्वयंपाकाच्या काकुंनी तिला जवळ घेऊन म्हटलं, "किती छान आहेस !. खुप बरं वाटलं बघ तुला घरी बघुन. ताई अश्या हॉस्पीटलमध्ये ऍडमीट झालेल्या आता त्या पण घरी येतील. दादांच पण सगळं ठिक होईल. डोळ्यातलं पाणी पुसुन त्या स्वयंपाकाला लागल्या. तीला काय आवडतं ते विचारुन त्यांनी स्वयंपाक सुरु केला. थोडावेळ तिथे बसुन ती परत बेडरुम मध्ये येऊन बसली.

दुपारी जेवणाच्या वेळी तो आला. "कसं वाटतय? माझं सकाळी जाणं खुप गरजेचं होतं गं. आईची तब्येत अचानक बिघडली आणि डॉक्टारांचा फोन आला होता. तु खुप गाढ झोपली होतीस, मग उठवायचं जीवावर आला, म्हणून उठवलं नाही. जेवुया का आपण? लगेच हॉस्पिटलला परत जायच आहे." तिने गडबडीत पानं घेतली. एकीकड ह्याच्या इतक्या प्रेमळ वागण्यानं गोंधळल्या सारखं होत होतं आणि दुसरीकडे बरं पण वाटत होत. गेल्या काही वर्षात इतका प्रेमळपणा तिच्या वाट्यालाच आला नव्हता.

पुढच्या आठवड्यातच त्याची आई गेली. जाताना मुलाचा संसार परत सुरू झाल्याच्या समाधानात गेली. तो खुप खचल्यासारखा दिसत होता तीला. खुप प्रयत्न करत होता तिच्याशी बोलण्याचा पण ती मात्र लांब लांबच होती. त्यातच आईच्या जाण्यानं तो अगदीच एकटा झाला होता. ती च्या त्याच्यातली कोंडी कशी फॊडावी हेच कळत नव्हतं त्याला. त्याच्या जवळच्या मित्राने सल्ला दिला. "अरे बाहेर फिरायला घेऊन जा. कदाचित तुम्हाला दोघांना पण बरं वाटेल." त्याला पण आशा वाटली. खरतर घटस्फोटानंतर त्याला धास्तीच वाटत होती लग्न करायची.ही पण तिच्यासारखीच निघाली तर? पण हिला त्यानं तिच्या भावाच्या घरात बघितलं आणि आवडली त्याला एकदम शांत कमी बोलणारी, समोरच्याला काय हवं ते ओळखुन वागणारी. पुढच्या प्रत्येक भेटीत तो प्रेमातच पडत गेला. आणो एक दिवस त्यानं तीच्या भावाला विचारचं. भाऊ चांगलाच गांगरला कारण ती लग्नाला अजुनही तयार नव्ह्ती आणि त्या दोघांत नाही म्हटलं तरी १० वर्षांच अंतर होतं. त्याला भावाची ही अवस्था समजली. तो म्हणाला "अरे मी फक्त माझ्या भावना सांगितल्या तुला तिला जर कुणी चांगला मुलगा मिळत असेल माझी काही हरकत नाही पण तु एकदा विचार तिला. भावाला हायसं वाटलं. त्यानं हा विषय आईकडं काढला. साहेबाबरोबर घरोब्याचे संबधं झाल्यावर पुढच्या कित्येक गोष्टी जमणार होत्या. हो, नाही करत आई तयार झाली होती. पण तीला विचारणार कोण? जरी घरात भावाचा धाक असला तरी अशी गोष्ट बोलायला तो बिचकत होता आणि त्यातच तीला कुणाबरोबर तरी वरळीला बघितल्याची बातमी कळली. भावाच्या मित्राने बघितलं होत तिला आणि लगेच त्याला फोन करून सांगितलं होतं. ही बया आपल्या पुढच्या नोकरीचा फज्जा उठवणार हे लक्षात आल्यावर भावानं कुणालाही न विचारता तिच्या लग्नाचा घाट घातला, त्याच्या आईच ऍडमीट होण्यानं परिस्थीती आणखिनच चिघळली आणि लग्न झालं.

पण लग्नाचा इतीहास माहिती नसलेली ती आणि तो मात्र पुर्ण जन्मासाठी एका बंधनात अडकले.  बाहेर जाण्याच्या एक दिवस आधी तिला तिच्या सरांचा फोन आला आणि त्यंनी भेटायला बोलावल तिला काही कागदपत्र पुर्ण करुन हवी आहेत म्हणाले. ती गेली ऑफीसला तास-दोन तासात परत येते म्हणून गेली.

ऑफीस मध्ये सरांच्या जागी ’तो’ बसला होता. तिला धक्काच बसला. "तू इथं कसा ? आणि सर कुठे आहेत? त्यान तिला बसायला सांगितलं काका १० दिवसापुर्वी हार्ट अटॅकनं गेले आणि मी माझ्याकडे सगळं सोपवुन गेले. तुझा नंबर त्यांच्या डायरीत मिळाला. म्हणून फोन केला तर कळलं की मागच्याच महिन्यात लग्न झालं तुझं. आपल्या भेटीनंतर लगेचच. पण त्यावेळी काहीच बोलली नाहीस. सांगितलं असतस तर लग्नाला  आलो असतो मी. तीच्या घश्याला कोरड पडली होती. ती तशीच उभी होती, काय गं काय झाल बर नाही का’ असं त्यानं  म्हणे पर्यंत ती चक्कर येऊन पडली. मागच्या महिन्याभरातला सगळा ताण खुप असह्य झाला होता तीला. ऑफीस मधल्या मॅडमच्या मदतीने त्याने तीला ऑफीसमधल्या गेस्टरुम मध्ये झोपवलं आणि डॉक्टरांना बोलवलं. ’बी.पी. लो आहे. खूप तणावाखाली वाटत आहेत या. काही गोळ्या देतो ह्यांना. पण आता ह्यांना शांत पडू द्या.’

बर्याच वेळानं तीने डोळे उघडले. आधी कळलच नाही तिला ती कुठं आहे ते ?  मंग भानावर आली. शेजारीच तो बसला होता. थोडा विचारात पडलेला आणि बराचसा काळजीत पडलेला. तिला आठवलं काय झालं ते. ती उठून बसली. 
"बंर वाटतय का आता ? कशाची काळजी करतेस एवढी ? बराच उशीर झाला आहे. चाल , मी सोडतो घरी तुला." उत्तराची अपेक्षा न करता तो उठायला लागला. 
"थोडावेळ बसशील ? मला बोलायचं आहे ", ती म्हणाली. 
तिच्याकडे आश्रयाने बघत तो खाली बसला. जे काही तिला पहिल्यांदा नाटक बघिल्याप्सून वाटत होत ते तिने सांगितलं , अगदी लग्नापर्यंत. 
तिच बोलण मन लावून ऐकणारा तो हसायलाच लागला. हसून हसून डोळ्यातून पाणी यायला लागलं. कसाबसा स्वताला थांबवत , आश्चर्यचकित तिला म्हणाला ," अगं वेडी आहेस का तू ? तुला वाटलाच कसं कि मी तुझ्यावर प्रेम करेन ? स्वतः ला बघ जरा , आपण खूप वेगळे आहोत गं . आपल्या काही आवडी सारख्या आहेत , पण याचा अर्थ आपण पूर्ण आयुष्य एकमेकांबरोबर कसे काय काढू शकतो ? माझे आणि माझ्या बायकोचे काही प्रश्न आहेत , पण याचा अर्थ मी तिला सोडून तुझ्याबरोबर येईन असा नाही होत ना ? तुझ्याशी मनमोकळ बोलतो म्हणजे तुझ्याशी मी लग्न कराव असा थोडंच आहे ? मला तू कायम चांगली मैत्रीण म्हणून पसंद आहेस. यापेक्षा जास्त काही नाही . तुझ्यासारख्या काकूबाई बरोबर कोण आयुष्य काढणार? मैत्रीण म्हणून ठीक आहेस गं . मी तुझ्याकडे आतापर्यंत सल्ला तरी मागितला आहे का कधी ?" 

तिच्या मनाच्या चिंधड्या होत चालल्या होत्या. इतकी वर्ष मनामध्ये जपलेल्या प्रेमाचे धिंडवडे निघताना ती कोरड्याठक्क डोळ्यांनी आणि बधिर मनान ऐकत राहिली. गप्प होवून गेली. 

तिथून निघाली तशी त्याने विचारलं , "सोडू का ?". तिच्यापर्यंत ते शब्द जणू पोहोचलेच नाहीत . ती चालत निघाली . दिशा कळत नव्हत्या तिला. आजूबाजूचा गोंगाट जाणवत नव्हता . एवढ्यात तिचा मोबाईल वाजला. नवर्याचा फोन होता ," कुठे आहेस गं ? बराच वेळ झाला , घरी आली नाहीस म्हणून फोन केला ". त्याचा प्रेमळ आवाज ऐकून भानावर आली ती. तिला एकदम खूप रडायला आलं . " तू तिथच थांब मी येतो ". समोर नवर्याला बघून खूप अपराधी वाटायला लागलं तिला. तो खूप प्रेमान वागवत होता तिला . गाडीत बसल्यावर त्याच्या मिठीत झोकून दिलं तिने स्वतःला . त्याला वाटल खूप दिवसांनी ऑफिस मधल्या मैत्रीणीना भेटल्यामुळे हळवी झाली असेल. घरी परत येताना त्याने तिच्यासाठी बाहेर फिरायला गेल्यावर घालता यावेत म्हणून काही कपडे घेतले. 

त्याच्याबरोबर हनिमून साठी बाहेर गेल्यावर मात्र नवर्याच्या प्रेमळ वागण्याने ती हळू हळू सावरली. तिला जाणवला तो त्याचा समजूतदार पणा , त्याचा प्रेमळपणा . आणि एका क्षणी तिला लक्ख जाणीव झाली. कि आता आपल्याला याच्याच बरोबर राहायचं आहे. जे घडल तो भूतकाळ होता . आणि तो संपला आहे . आपला वर्तमान काळ याच्याबरोबरच आहे . हळू हळू संसारामध्ये गुंतू लागली ती . पुढे २ वर्षांनी मुलगा झाल्यावर तर जे घडलं होत ते पण पुसट व्हायला लागलं.

आणि आता इतक्या वर्षानंतर नाटक बघताना तिला सगळं आठवायला लागलं. तिच्या मैत्रिणीने आग्रहाने तिला हे नाटक बघायला आणलं होतं . आणि या नाटकाचा हिरो तोच होता . त्या पण पुढच्याच रांगेत बसल्या होत्या . मधली सुट्टीत त्याने निरोप पाठवून बोलावून घेतलं तिला आणि भडभडा बोलायला लागला ,"खूप मिस केलाय तुला मी.  माझ तुझ्यावर खूप प्रेम होत, आहे. खूप उशिरा कळल मला. माझ लग्न झाल्यावर. म्हणूनच तुला भेटायला बोलावलं होत मी . तू हो म्हणाली असतीस तर मी घटस्फोट घेणार होतो . नाहीतरी सगळ बिनसलचं  होतं.  लग्नानंतरच भेटलीस एकदम . तेव्हा जाणवलं कि तुझा संसार विस्कटणं योग्य नाही . तुझ प्रेम कळलं होततं गं मला. पण तुझ्याशी बोलायला मी उशीर केला. मला माफ कर . त्या दिवशी तुला दुखावून बाहेर पडलो मी , आणि एका गाडीने धडक दिली. २ दिवस हॉस्पिटल मध्ये होतो , बेशुद्ध . बारा व्हायला २ महिने लागले . घरी आलो तर बायकोने घटस्फोटाचे पापर समोर ठेवले. शांतपणे त्यावर सह्या केल्या. आणि दोघेही मोकळे झालो . त्यानंतर ६ महिन्यात काका गेले . जाताना सगळ माझ्या नावावर करून गेले . एक दिवस विचार करून सगळ विकल आणि हि नाटक कंपनी काढली. आता फक्त प्रयोग करत फिरतो . पण इतके दिवस मनात एक सल होता. तुला दुखावल्याबद्दल तुझी माफी मागायची होती. माफ कर मला ,"
घरी आल्यावर शांत वाटत होत तिला , जुन्या आठवणी त्रासदायक नव्हत्या वाटत. ती तशीच सोफ्यावर डोक ठेवून बसली . आणि तिला जाणवलं तिचा नवरा तिच्या कपाळावर हात फिरवतो आहे . खूप आवेगाने ती त्याच्या मिठीत शिरली . पहिल्यान्दाच तिला तो खूप हवाहवासा वाटला . 

7 comments:

  1. अप्रतिम कथा. खुप आवडली. वेग आणि पकड उत्तम.:-)

    ReplyDelete
  2. Masst aahe story anagha

    ReplyDelete
  3. अितसुंदर!!! भावना, कल्पना आिण वास्तविकता यांची ख़ूप छान सांगड घातली अाहेस तू..
    मनीष.

    ReplyDelete
  4. वाचायला सुरुवात केली आणि कथा संपल्यानंतरच थांबलो...मला वाटतं यामधून त्यातील ताकद लक्षात येते. मानवी नातेसंबंध आणि त्यातील गुंतागुंत सहजपणे मांडणे हे तुमचे लेखनातील वैशिष्ट्य आहे. सुरुवातीला माफीच्या ओळीची गरज नाही. खुप छान लिहीत आहात. वेळ द्या तुमच्यातील लेखीकेला..

    ReplyDelete
  5. Anagha chan lihites....Saglya gosti vachlya...

    ReplyDelete
  6. Chanch ga .. Utkanthavardhak aahe.. Sonali

    ReplyDelete
  7. Chanch ga .. Utkanthavardhak aahe.. Sonali

    ReplyDelete