Wednesday, 3 December 2014

मुग्धा -५ - शेवटचा भाग

मुग्धा सुन्न होवून बघतच राहिली त्याच्याकडे . तो जे काही बोलला , ते समजायला वेळ लागला तिला . आणि तिला अचानक सगळ्याची भयानकता जाणवली . काय करून बसलो आपण हे ? वरद असा आहे ? आपल्याला कसं कळल नाही हे ?
"बघ मी असा आहे . आपल्याला कुणी आवडलं तर चार दिवस मजा करावी झालं . नंतर तू तुझ्या वाटेला , मी माझ्या . कुणीही एकमेकाच्या वाटेत यायचं नाही . मी लग्न करेन पण तुझ्यासारख्या मुलीशी नक्की नाही . "  एवढं बोलून वरद उठला आणि निघून गेला .
ती तशीच बसून राहिली मिळणारे धक्के पचवत . हे सगळ असह्य होतं तिच्यासाठी . ती कितीतरी वेळ तशीच बसून राहिली . जेंव्हा वेटर थोडा मोठ्या म्हणाला ," काही आणु का मॅडम ?" तेव्हा ती दचकली आणि भानावर आली . ती तशीच उठली , सगळ जग आपल्याभोवती गरगरतय असा वाटत होतं तिला . ती ऑफिस कडं निघाली , पण धड चालताही येईना तिला . पायातली ताकद कुणीतरी शोषून घेतली आहे असं वाटत होतं तिला . डोक्यातले विचार भरकटत चालले होते तिचे . काय करून बसलो आपण हे ? एवढे वाहवलो ? त्याच्यासाठी , ज्याला आपली काहीही किंमत नाहीये . त्याच्यासाठी हा  खेळ होता फक्त . आपण  मूर्ख आहोत . आपण कसलीच खात्री करून घेतली नाही . त्याच्या प्रेमाची पण नाही .  त्याने बोलावलं आणि आपण गेलो . शी .
याच विचारांमध्ये ती ऑफिस ला पोहोचली . शिल्पा तिच्या जवळ आली . " मुग्धा , काय झालाय तुला ? अशी का दिसते आहेस ? तू आणी वरद हॉटेल मध्ये गेला होता ना ?  काय झालं ?"  ती सुन्नपणे बघतच राहिली शिल्पाकडे . शिल्पाच बोलणं जणू तिच्या कानापर्यंत पोहोचताच नव्हंत . शिल्पा ला कळेना हि अशी का बघतेय ते . काहीतरी झालं आहे एवढ लक्षात आलं तिच्या . तिने थोडं काळजीनच विचारलं " काय झालं ?" तिच्या काळजीन मुग्धाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तशी शिल्पा तिला  बाहेर आली आणि थोडी वैतागूनच म्हणाली ,"काय झालं आहे नक्की ? सांगणार आहेस का आता ? काल पण असंच केलंस ."
थोडी शांत होत पहिल्यांदाच मुग्धा ने जे घडलं ते सांगितलं . शिल्पा आवक् झाली ऐकुन . " अगं , इतकं सगळं मनात होतं  आणि एकदाही बोलली नाहीस मला ? निदान त्याच्याघरी जायच्या आधी तरी ? काहीतरी माहिती काढली असती आपण . अशी कशी तू ? त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही , आणि भेटायला गेलीस तू त्याला ?"
ती काहीही बोलली नाही . फक्त रडतं राहिली . शिल्पा ला दया आली तिची . " रडू नको गं . मी बोलू का वरद शी ?"
"काय बोलणार तू ? त्याच प्रेम नाहीये माझ्यावर ", कळवळून मुग्धा म्हणाली ," त्याला फक्त शरीर हवं होतं गं, माझ्या मनाशी काही लेणदेण नाही त्याला . मी सगळ्यांपासून लांब राहत होते तेच बरं होतं . निदान अशी फसले तरी नसते . " शिल्पाने तिला थोडं शांत होवू दिलं आणि मग विचारलं ," आता काय ठरवलं आहेस ?"
" मी नोकरी सोडेन ".
"काय !?" शिल्पाचा काय इतका मोठा होता , कि आजूबाजूने जाणारे सगळे तिच्याकडे बघायला लागले .
" अगं वेड लागलं आहे का तुला ? एवढी सोन्यासारखी नोकरी सोडणार तू ? आणी घरी काय सांगणार ? "
"घरी काय सांगणार अगं ?पण वरद समोर असताना असं परक्यासारख काम करणं जमणार नाही मला . आणि त्यातून तो दुसऱ्या मुलीच्या हातात हात घालून बसलेला तर अज्जीबातच चालणार नाही . वेडी होईन गं मी . " एवढं बोलून ती परत रडायला लागली .
"अगं रडतेस कसली ? चीड यायला हवी तुला . त्याच्या मुस्कटात मारायला हवीस . सरांच्या कडे तक्रार करायला हवीस . ते राहील बाजूला , रडतेस कसली ? आणी या असल्या माणसासाठी नोकरी सोडणार तू ? त्याला काय तू साधी आहेस , त्याच्यावर प्रेम करतेस हे कळलं नसेल ? त्यान गैरफायदा घेतला आहे तुझ्या भावनांचा ,त्याला काय असंच सोडायचं ?" खूप  पोटतिडकीन बोलत राहिली आणि आपण फक्त तिला खूप रडवतो आहे हे जाणवल्यावर गप्प झाली .
ऑफिस मधून घरी येताना पण रस्त्यावरच्या सगळ्यांना कळलंय आपण काय केलाय ते ,आपण कसे मुर्ख आहोत ते , असंच काहीसं वाटत राहिलं तिला .
 घरी आल्यावर बरं नाही म्हणून ती सरळ आत जाउन पडली . तशी आई आत आली ," मुग्धा , तुला राग येत असेल ना गं माझा ? सारखी बोलते म्हणून ? पण अगं आम्ही असेच वाढलो आहोत . स्वतःच्या मनाला मारून जगायचं . मनासारखे काहीही करणं म्हणजे चुकीचंच आहे असंच शिकवलं गेलं आम्हाला . मन मारण्यात संसाराचं भलं होत याच विचारांची
झाले गं मी पण . तु पण तसंच करावस असं वाटत होत मला . म्हणून तुझ्यावर बंधन घालंत गेले मी . लोकांना भिवून जगतो  गं आम्ही, तू पण तसंच जगावस असा वाटत राहील मला . तुला वाटत असेल आई आज हे सगळं का बोलतेय ? खरतर २-३ दिवसापासुन बोलायचं ठरवत होते मी . पण तुझी तब्येत बरी नाही  बसले .
परवा तुझी डायरी वाचली , त्यातली तुझी स्वप्नं वाचली . उंच आकाशात उडायची , सगळ जग बघायची , भरपूर पुस्तकं वाचायची , एक सुंदर हसरं आयुष्य जगायची . आणि जाणवलं आपण आपल्या पोटाच्या मुलीलाच ओळखु शकलो नाही . आई अशी नसते न गं ? तुलापण असंच वाटत असेल ."  बोलतां  बोलतां आईचा कंठ भरून आला .
मुग्धा बघतां  बघतां आई च्या कुशीत शिरली आणि स्फुंदून स्फुंदून रडायला लागली . आईचा हात डोक्यावरून फिरत असताना अपराधीपणाची जाणीव अजूनच गडद झाली .
सकाळी तिला उठवेना , डोकं आणि अंग पण जड झाल्यासारखं  वाटत होतं . आई उठवायला आली आणि तिची अवस्था बघून घाबरली . तिने कपाळावर हात ठेवला आणि चटका बसला तिला . चांगलीच तापली होती ती . आईने तिला ताप  उतरायची गोळी दिली आणि त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरांना फोन केला .
" खूप जास्त ताण घेतला आहे मुग्धाने वाहिनी . तिला एक आठवडा तरी ऑफिस ला जाऊ देवू नका . फक्त विश्रांती गरजेची आहे ." डॉक्टरांनी सांगितले .
तिने एक आठवड्याची सुट्टी टाकली .  एकीकडे आईशी संबंध सुधारत होते आणि दुसरीकडे टोचणी अजूनच वाढत होती.
आठवड्यानंतर ती ऑफिस ला परत आली . शिल्पा तिच्या जवळ आली ," कशी आहेस मुग्धा आता ? किती त्रास करून घेतलास गं स्वतःला ? तिकडे तो मज मारतोय आणि तू मात्र ?"
" चूक माझ्या हातून घडली आहे . शिक्षा पण मलाच भोगायला हवी . " खिन्नपणे मुग्धा म्हणाली .
"मुग्धा तू बदली करून घे , आपल्या गोव्याच्या ऑफिस ला . आवडेल तुला तिथं राहायला "
"बघते " म्हणून तिने कॉम्पुटर मध्ये डोकं घातलं . पण तिचं  मन काही कामात लागेना . तेवढ्यात तिला वरद दिसला , मीना बरोबर परत येताना . आणि मुग्धाच्या हृदयातून कळ आली . ती अस्वस्थ झाली खूप . वरद नं लक्ष दिला नाही .
आजचा दिवस संपतच नाहीये असं वाटलं तिला .
शेवटी आईशी बोलून तिनं गोव्याला बदली करून घेतली . आईने पण फारसे आढेवेढे घेतले नाहीत . कुणास ठाऊक आजपर्यंत जे वागली त्याचं परिमार्जन असावं .
गोव्याला दोघींच्या पण आयुष्याचा नवीन अध्याय सुरु झाला . गोव्याच्या वातावरणान तिला भुरळ घातली . जे घडलं त्याची तीव्रता हळूहळू कमी व्हायला लागली . दोघींचं आयुष्य खूप छान जायला लागलं . इथे दिवस भरभर जात होते . ती आईबरोबर अष्टविनायक करून आली आणि आई तिच्यासाठी म्हणून केरळ ला आली . दोघींना पण आपण एकमेकींसाठी आहोत याचा खूप आनंद होत होता , नव्याने सापडलेलं नातं दोघीही मनापासून उपभोगत होत्या .
बघता बघता दोन वर्ष निघून गेली . आता मात्र आईला तिच्या लग्नाचे वेध लागले . आणि ती मात्र विषय टाळायला लागली . मात्र या सगळ्यामुळे तिला जे घडलं होतं ते आठवल आणि पहिल्यांदाच जाणीव झाली , हे ओझ घेवून आपण लग्न नाही करू शकत .
एके दिवशी ऑफिस मध्ये काम करत असताना कुणीतरी अचानक समोर येवून उभं राहिलं . तिने मन वर करून पाहिलं . वरद . ती दचकली . तो खूप हरवल्यासारखा दिसत होता , बारीक झाला हित , डोळे खोल गेले होते .
"काय हवंय ?" नकळत खूप कोरडेपणाने तिने विचारले ?
" तुझ्याशी बोलायचं आहे " त्याच आवाज पण खूप खोल गेला होता
" मला वेळ नाही , खूप काम आहेत मला "
" नाही म्हणू नको गं मला , खूप धाडस करून आलो आहे इथं मी . हात जोडतो तुझ्यापुढे . खूप वेळ नाही घेणार तुझा ." तो गयावया करत म्हणाला . तिला आश्चर्याचा धक्का बसला  आणी नकळत बोलून गेली ती ,"ठीक आहे , लंच मध्ये भेटू . ऑफिस समोर सुखसागर म्हणून हॉटेल आहे तिथे ये १वाजता . "
" खूप उपकार झाले गं " त्याने हात जोडले
तो गेला आणी मुग्धाच कामातलं लक्ष उडालं . काय  झालाय याचं ? असा काय झाला आहे हा ? काय बोलायचं असेल ? ते पण एवढ्या दिवसांनी ?
कसाबसा १वाजेपर्यंत वेळ काढला तिने . आणि ती हॉटेल कडे गेली . तो आधीच आला होता .
"काही खाणार का ? "
"नको "
" थोडं  घे गं  , प्लीज ." त्याने आर्जवाने म्हटलं , तिला नाही म्हणता आलं नाही .
त्याने कॉफी आणी सॅंण्डविचेस् मागवली. "बोल आता , माझ्याकडे फारसा वेळ नाही " .
" माफ कर माल . मी तुझा अपराधी आहे गं . मला त्याची जाणीव नव्हती . आपल्याच मस्तीत होतो मी . जोपर्यंत सॅली भेटली नाही , तोपर्यंत मुलीना वापरून सोडून द्यायचं असतं , असाच वाटत राहिलं मला . खूप चुकलं गं माझं" म्हणून त्यानं ओंजळीत चेहरा लपवून रडायला सुरवात केली .
मुग्धाला आपण काय करावं हे कळेना . ती गप्प बसली . थोडा शांत झाल्यावर वरद ने परत बोलायला सुरवात केली ," तू निघून गेल्यावर मला काहीही फरक पडला नाही . किंवा तुझ मी काय करून ठेवलं होता याचाही . कारण मला भेटलेल्या मुलीपण अशाच होत्या, फारशा न गुंताणाऱ्या . माझी मौजमजा चालुच होती . आणी त्यातचं ती भेटली , सॅली. तुझ्याच जागेवर आली . सुंदर , हुशार आणि खूपच छान होती . कुणीही प्रेमात पडावी अशी .
मी तर तिला बघितल्यावर पागलच झालो . एकदम प्रेमात पडलो . तिच्याशिवाय जगण व्यर्थ आहे असं वाटायला लागलं.  एकत्र काम करत असल्यामुळं तिचा सहवास पण भरपूर होता . तिच्या  वागण्याने  आणि हुशारीने तर  जास्तच आवडायला लागली मला ती . तिच्याशिवाय मला काही सुचेना . ती पण खूप जवळ येत गेली . बाकी मुलींबद्दल जसं वाटायचं तसं सॅलीबद्दल वाटत नव्हत . तिच्याबद्दल फक्त प्रेम होतं मनात . तिचं माझ्याबरोबर असणं खूप महत्वाचं वाटत होत मला . तिच्याशिवाय एकही क्षण काढणं म्हणजे शिक्षा वाटत होती मला . मी तिला काहीही सांगितलं नव्हत पण तिला कल्पना आली असावी . माझे सगळे दिवस आनंदाने भरलेले होते . ती म्हणेल ते करायची तयारी होती माझी . अगदी उंच कड्यावरून उडी मार म्हणाली असती तरी , मी मारली असती .
जवळपास ६ महिन्यांनी मी तिला मागणी घालायची ठरवली . तिला लोणावळा खूप आवडायचं . म्हणून मग तिकडेच तिला घेवून जायचं ठरवलं . मी तिला विचारल्यावर ती हो म्हणाली . तिला बहुतेक अंदाज आला होता . लोणावळ्याला पोहोचल्यावर एका छानशा ठिकाणी नेलं तिला मी . तिथे पोहोचल्यावर तिला एक टपोरं लाल गुलाबाचं फुल दिलं . आणि सिनेमात दाखवतात तसा तिच्यापुढे गुडघे टेकून , तिच्यासाठी घेतलेली हिऱ्याची अंगठी पुढे करत तिला म्हणालो ,' सॅली, आयुष्य खूप सुंदर आहे . पण , त्याला जर सुंदर साथ मिळाली तर ते अजूनच सुंदर होतं . मला तुझ्या साथीने माझं आयुष्य सुंदर करायचं आहे . तुझ माझ अस्तित्व एकचं असावं असं वाटतंय मला . माझ्या आयुष्याला अर्थ तुझ्यामुळे मिळणार आहे . तू आणि मी एक व्हावं असं वाटतंय मला . होशील का गं माझी ? विरघळशील माझ्यात ?'
सॅली खूप लाजली . तिने पुढे केलेल्या बोटात मी अंगठी चढवली आणि तिला मिठीत घेतलं . मी पूर्ण झालो होतो .
आजही लाजलेली सॅली आठवली कि पीळ पडतो माझ्या मनाला . माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस होता तो . आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसलो होतो , नवीन आयुष्याची स्वप्नं रंगवत होतो .
पण आयुष्य किती क्रूर असतं गं . मी तुझ्याशी जे वाईट वागली त्याचा बदला म्हणून देवाने माझी सॅली माझ्यापासून दूर केली . " वरद चा गळा भरून आला . मुग्धा शांत बसली होती .
" आम्ही परत येत असताना एका ट्रक ने धडक दिली आम्हाला . सॅली जागच्या जागी गेली . मी बेशुद्ध होतो आठवडाभर . शुद्धीत आलो तेव्हा डॉक्टरांनी माझ्या हातात ती अंगठी ठेवली . आणि मला कळलं आपण आता कायमचे एकटे राहिलो . दोन महिन्यात मी बरा झालो . पण मनाच्या जखमा भरून येत नाहीत गं . तुला मी दिलेल्या जखमा पण तशाच असतील . सॅली शिवाय येणारा प्रत्येक दिवस माझ्या यातना वाढवत होता . मला जगणं  नकोसं करत होता . माझी अवस्था बघून आईने मानसोपचार तज्ञाला दाखवले मला . त्यांच्या उपचाराने मला बंर वाटत होतं . पण मनावरच ओझं काही उतरत नव्हत . असंच  एके दिवशी मी डॉक्टरांना तुझ्याबद्दल सांगितलं . आणि त्यांनी मला माझीचूक सांगितली . तुझी माफी मागायला सांगितली . खंर सांगतो मुग्धा , तुझी माफी मागायची ठरवली आणि मला खूप हलक वाटलं . खूप धाडस करून आज तुझ्यापुढे उभा आहे मी . माझ खूप चुकलं गं , माफ कर मला " त्याच्या डोळ्यात अश्रु होते आणि हात जोडून उभा होता तो .
मुग्धाच्या डोळ्यात अश्रु होते आणी मनात खळबळ . खूप वाईट वाटत होता तिला . तो कसाही असला तरी एकेकाळी प्रेम केलं होत तिने त्याच्यावर .
तिथून निघताना पहिल्यांदा खूप मोकळं वाटत होतं तिला . एवढ्या दिवसातली अपराधी पानाची जाणीव नाहीशी झाली होती . खांदे पाडून पाठमोऱ्या चालणाऱ्या वरद कडे पाहून देवाला साकडं घातलं तिने ,'याला सुखी ठेव'.




2 comments:

  1. छान प्रयत्न...तुमच्या कथेतला शेवट नाट्यमय असतो...जरा जास्त वेळ गेला तरी चालेल पण अजून सफाई येऊ द्या...तुमच्यातील गुणवत्ता पुरेपूर वापर करा. पण खुपच छान , अभिनंदन ..

    ReplyDelete
  2. सूंदर कथा. शेवटपर्यत खिळवुन ठेवणारी.. एखादा मनोरंजक चित्रपट पाहतोय असे वाटले. छान. अजुन येउदेत.

    ReplyDelete